फायर बुलेट'ची फक्त बुलेट होते तेव्हा एटापल्लीतील प्रकार : साहित्य काढले, सीओ करतात 'अप-डाउन






एटापल्ली;-छोट्या शहरांमध्ये गल्लीबोळांत आग लागल्यानंतर तेथे अग्निशामक दलाचा बंब पोहोचू शकत नाही. अशावेळी जलदगतीने मदतकार्य करता यावे, यासाठी नगरपालिका व नगरपंचायतींना फायर बुलेट उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, दक्षिण गडचिरोलीतील एटापल्ली नगरपंचायतीत 'फायर'चे साहित्य काढून खुद्द मुख्याधिकारीच बुलेटप्रमाणे या वाहनाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अग्निशमन करण्याच्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.


अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करून जलदता आणणे, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत तात्काळ पोहोचविण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हा उद्देश समोर ठेवून फायर बुलेटची रचना केली आहे. त्यावरून अग्निशमन दलाचे दोन कर्मचारी प्रवास करू शकतात. दरम्यान, एटापल्ली नगरपंचायतीला चार महिन्यांपूर्वी फायर बुलेट (एमएच ०२ जीजी-७६६९) उपलब्ध झाली होती. मात्र, मुख्याधिकारी प्रणय तांबे यांनी बुलेटचे अग्निशमनचे साहित्य काढून टाकले व तिचा साध्या बुलेटप्रमाणे वापर सुरू केल्याचे उजेडात आले आहे.


तांबे हे अहेरी येथे वास्तव्यास आहेत. ते याच बुलेटवरून दररोज अहेरीवरून एटापल्लीला ये-जा करत आहेत.


खुद्द मुख्याधिकारीच फायर बुलेटचा वापर स्वमालकीच्या बुलेटप्रमाणे करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.



काय आहे फायर बुलेटचे वैशिष्ट्य


नामांकित कंपनीची ३५० सीसीची बुलेट मॉडीफाईड करण्यात आली आहे. यामध्ये दोन फोम सिलिंडर ज्याची क्षमता नऊ लिटरची आहे, ते बसवण्यात आले आहेत. याचा प्रेशर ३१२ हॉर्स पॉवरचा आहे. या गाडीबरोबर प्रथमोपचारासाठी आवश्यक असणारे किट देण्यात आले आहेत. या फायर बुलेटद्वारे गल्लीबोळासह अरुंद मार्गाच्या ठिकाणी लागलेल्या आगीवर विनाविलंब नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. त्यातून जीवित व वित्तहानी टाळणे हा प्रमुख उद्देश आहे.

Post a Comment

0 Comments