आंबटपल्ली;- ग्रामपंचायत हद्दीतील तेंदूपत्ता तोड मजुरांना मागील वर्षाची थकीत मजुरी मिळालेली नसतानाही नवीन लिलाव प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न असून *नवभारत* या वृत्तपत्रात ७ एप्रिल ला लिलाव करण्यात येत असल्याची जाहिरात लावण्यात आली आहे.
या विरोधात मजुर आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे.
तक्रारकर्त्यांच्या मते, मागील वर्षीच्या मजुरीबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांच्याकडे आधीच तक्रार दाखल असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत लिलाव प्रक्रिया राबवणे अन्यायकारक ठरेल, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
मजुरांच्या प्रमुख मागण्या:
1. थकीत मजुरी पूर्णपणे अदा करेपर्यंत नवीन तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया स्थगित करावी.
2. सध्याची ग्रामकोष समिती बरखास्त करून नवीन लोकाभिमुख समिती स्थापन करावी.
3. संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी आणि तक्रारीच्या अंतिम निर्णयापर्यंत कोणताही लिलाव होऊ नये.
या मागण्यांची गंभीर दखल न घेतल्यास पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याचा इशारा मजूरांनी दिला आहे. संबंधित प्रशासनाने या तक्रारीवर त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे.
0 Comments