गडचिरोल्ली;- आलापल्ली वन विभागांतर्गत येणाऱ्या पेंडीगुडम वनपरिक्षेत्रातील गोमणी, कोडीगाव खंड क्र. १८१ मध्ये मोठ्या प्रमाणात मौल्यवान सागवान व इतर झाडांची अवैध वृक्षतोड झाल्याचा खळबळजनक आरोप भारतीय मानवाधिकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष विश्वदीप वाळके यांनी केला आहे.
या वृक्षतोडीत संबंधित वनरक्षक, क्षेत्र सहाय्यक आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा थेट सहभाग असून, त्यांनी स्वार्थासाठी तस्करांशी संगनमत करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा ठपका वाळके यांनी ठेवला आहे.
वृक्षतोडीचं गांभीर्य :
वाळके यांनी स्वतः सदर खंडात भेट देऊन सागवान वृक्षांची कत्तल झाल्याचे दृश्य पाहिले. त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधता, वर्षानुवर्षे ही तोड सुरू असल्याचे व अधिकार्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशी व निलंबनाची मागणी:
या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषींवर फौजदारी आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, तसेच संबंधित अधिकार्यांचे निलंबन करावे, अशी स्पष्ट मागणी वाळके यांनी मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.
बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा:
जर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर पुढील काही दिवसांत बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला.
0 Comments